संपादकीय – एप्रिल २०१८

_mg_0080परीक्षांचा मौसम संपून आता मुलांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. पूर्वी परीक्षा संपल्याचा मुलांना कोण आनंद व्हायचा. आता दोन महिने अभ्यास नाही,कुठलेही वेळापत्रक नाही, आई बाबांचे ओरडणे नाही, फक्त स्वच्छंदपणे बागडायचे !

गेल्या काही वर्षात पार्ल्यात सुट्टीतील शिबिरे सुरु झाली. मुलांनी सुट्टीतील हा वेळ ‘वाया’ घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकावे हा त्यामागचा हेतू. हेतू स्तुत्य असला तरी त्याचा हल्ली अतिरेक होऊ लागला आहे असे वाटते. अनेक so called ‘शिबिरात  अभ्यासांचेच किंवा त्याच्याशी संलग्न असलेले विषयच शिकवतात. काही ठिकाणी तर चक्क पुढल्या वर्षीचा अभ्यास सुद्धा सुरु करतात. ह्या सर्व शिबिरांमध्ये मुले येवढी गुंतुन जातात की त्यांना सुट्टीचा ‘फील’ येतच नाही. आजच्या स्पर्धात्मक जगात ह्याला पर्याय नाही असा युक्तिवाद अनेक जण करतील पण मग मुलांचे व्यक्तिमत्व  सर्वांगाने कसे फुलणार ?

उन्हाळ्याच्या सुट्टीचा उद्देश काय असतो ? तर वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना थोडे दिवस पूर्णपणे टेन्शन विरहित खेळायला मिळावेत. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून त्यांनी बाहेर पडावे, वेगवेगळे खेळ खेळावेत, सहलीला जावे, निसर्गाची गट्टी जमवावी, ज्यायोगे त्यांचा अभ्यासाचा शीण पूर्णपणे नाहीसा व्हावा. आज मात्र केवळ आई बाबांना वेळ नाही म्हणून मुलांना कुठल्यातरी शिबिरात अडकवायचे हे कितपत बरोबर आहे ? ह्यात अनेक वेळा मुलांच्या आवडीपेक्षा ‘ह्याचा पुढे काय उपयोग ?’ ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचाच प्रयत्न असतो.

व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरात जाण्यापेक्षा स्वच्छंदपणे बागडल्याने, मित्रांबरोबर गप्पा मारल्याने, वेगवेगळे खेळ खेळल्याने, प्रसंगी थोडी भांडणे, मारामारी केल्याने व्यक्तिमत्व जास्त सुदृढ होते असे माझे मत (व अनुभव देखील) आहे.

आपल्याला काय वाटते ?

यावर आपले मत नोंदवा