संपादकीय – मार्च २०१८

_mg_0080सद्धया दहावी बारावीच्या परीक्षांचे दिवस आहेत. विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. मैदाने ओस पडली आहेत. अनेक आयांनी ऑफीस मधून परीक्षेसाठी सुट्टी काढली आहे. बाबांनी आउटस्टेशन टूर्स पुढे ढकलल्या आहेत. घरचा टीव्ही बंद झाला आहे. मोबाईल फक्त मित्राला अभ्यासातील शंका विचारण्यापुरता सुरु आहे. कुठल्याही प्रकारच्या मनोरंजनावर सक्त बंदी आहे. सर्व वातावरण कसे परीक्षामय झाले आहे.

वरील वर्णनात थोडी अतिशयोक्ती असेलही पण पार्ल्यातील अनेक घरांमध्ये अश्याच प्रकारचे वातावरण आहे हे आपण नाकारू शकत नाही. आजच्या युगात असलेली जीवघेणी स्पर्धा व त्यामुळे अभ्यासाला व मार्कांना आलेले अवास्तव महत्व ह्यामुळे मुलांचे बालपण व तरुणपण तर कोमेजले आहेच पण घरातील खेळीमेळीचे वातावरण, एकमेकातील नातेसंबंध ह्यावरसुद्धा ह्या परीक्षांचा परिणाम होत आहे. ह्या सगळ्याची खरंच कितपत गरज आहे ? कुटुंबाकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा व जीवघेण्या स्पर्धेचा ताण ह्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे; ह्याचाही विचार झाला पाहिजे. अनेक वेळा पालक आपली अपूर्ण स्वप्ने मुलांवर लादतात. हे सुद्धा चुकीचे आहे.

आमची बँच बारावी होऊन आता ३५ च्या वर वर्षे झाली आहेत. त्यावेळी सुद्धा मार्कांवर आधारित जातीयवाद होताच. पण आता इतक्या वर्षांनंतर असे दिसते कि शाळेतील अनेक हुशार (?) विद्यार्थी पुढे म्हणावे तसे चमकले नाहीत ह्या उलट अनेक ढ (?) विद्यार्थ्यांनी पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात नावे कमवली. अनेकांनी तर ज्या विषयात शिक्षण झाले तो सोडून भलत्याच विषयाचे प्रोफेशन बनवले.

 मित्रांनो, ह्या सगळ्याचा अर्थ एकच. अभ्यास जरूर करा पण फक्त अभ्यास करू नका. इतरही आवडीच्या उपक्रमात सहभागी व्हा. भविष्याची जास्त चिंता करू नका व आई बाबांना सांगा Just Chill !

यावर आपले मत नोंदवा